
‘सत्त्व फाउंडेशन’
SATV FOUNDATION
Strategic Alliance for Transforming Villages
श्री. चंद्रकांत नारायण दळवी, IAS (Retd.)
निढळचे सुपुत्र असलेले श्री. चंद्रकांत दळवी भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आय.ए.एस.) १९९५ च्या ‘महाराष्ट्र केडर’चे अधिकारी आहेत. निढळ (ता. खटाव, जि. सातारा) हे त्यांचे जन्मगाव.
श्री. दळवी यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निढळ येथे पूर्ण केल्यानंतर कृषी महाविद्यालय, पुणे येथून बी. एस्सी. (अॅग्रि.) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून सुवर्णपदकासह एम. एस्सी. (अॅग्रि.) शिक्षण पूर्ण केले.
श्री. दळवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र यांचे सहसचिव, जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी पुणे जिल्हा, ‘यशदा’ प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था), महाराष्ट्र राज्य, विभागीय महसूल आयुक्त, पुणे आदी प्रमुख पदांवर काम केले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील श्री. दळवी यांची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. निरनिराळ्या पदांवर काम करीत असताना त्यांनी अनेक योजना संकल्पित करून सरकारच्या वतीने त्यांची आखणी व अंमलबजावणी केली. या योजना अतिशय लोकप्रिय ठरल्या. नागरिकांच्या अनेक समस्या दूर होण्यास या योजनांची मोठी मदत झाली. काही ठळक योजना पुढीलप्रमाणे.
१) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान : सन २०००
२) हागणदरी मुक्त गाव योजना : सन २००२
३) महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना : सन २००७
४) झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोझल : सन २००८
५) ई-महाभूमी : सन २०१०
जिल्हाधिकारी, पुणे, या पदावर असताना प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी ‘झीरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ हा उपक्रम तयार करुन त्यांनी यशस्वीपणे राबवला. भूमी अभिलेख विभाग व सहकार खात्यातही त्यांनी झिरो पेंडन्सी प्रभावीपणे राबवली. पुणे विभागीय महसूल आयुक्तपदाच्या काळात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदा, नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये झीरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल हा उपक्रम राबविला आहे. राज्य सरकारने एप्रिल २०१८ पासून ‘झिरो पेंडन्सी’ कार्यपद्धती राज्यातील संपूर्ण शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू केली आहे. श्री. दळवी यांचे ‘झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोझल’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. जलद व लोकाभिमुख सेवा कशा देता येतील, यासाठी हे पुस्तक प्रशासनात दिशादर्शक मानले जाते.
श्री. दळवी यांना आजवर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि हागणदारी मुक्त गाव या यशस्वी योजनांबद्दल महाराष्ट्र शासनाचा ‘स्वच्छता दूत पुरस्कार’, पाणलोट क्षेत्र विकास कामाबद्दल मुंबईच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा ‘जलसंधारण पुरस्कार’, महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचा ‘महात्मा गांधी शांतता पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार’, ई-मोजणी प्रकल्पाला ‘स्कॉच स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’, ई-मोजणी प्रकल्पांतर्गत ‘डिजिटल इन्क्लूजन’ साठी ‘मंथन पुरस्कार’, अमृतवेल गव्हर्नन्स पुरस्कार, ‘यशवंत-वेणू ग्रामसंस्कृती पुरस्कार’, सातारा भूषण आदी पुरस्कार मिळाले आहेत.
श्री. दळवी यांनी निढळच्या भौतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि आर्थिक विकासाच्या सोबत सामाजिक परिवर्तनात सतत योगदान दिले. गावच्या विकासाबाबत काही एक निश्चित दृष्टिकोन (व्हिजन) ठेवून विकासकामांचे नेतृत्व श्री. दळवी गेल्या ४१ वर्षांपासून करीत आहेत. उच्च शासकीय पदावर असलेल्या एखाद्या तरुणाने नोकरीला लागल्याच्या पहिल्या दिवसापासून सेवानिवृत्तीपर्यंत आणि त्यानंतरही अथकपणे ग्रामस्थ व नोकरदार तसेच व्यावसायिकांना बरोबर घेऊन अत्यंत तळमळीने आणि चिकाटीने काम करत राहिल्याचे हे दुर्मिळ उदाहरण ठरावे.
श्री. दळवी यांनी ‘स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्स्फॉर्मिंग व्हिलेजेस’ असे ब्रीदवाक्य घेऊन पुण्यात ‘सत्त्व फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या मदतीने निढळ आणि परिसरातील गावांच्या विकासाची रचनात्मक काम उभे करण्याचा मानस आहे.
या विकासप्रक्रियेत श्री. चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ते ‘सत्त्व फाउंडेशन’च्या कामात सहभाग देऊन अन्य गावांना कृतिशील मार्गदर्शन देणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा अन्य गावांना करून देणे, ही यामागची भूमिका आहे.

CIN - U74999PN2018NPL174746
CSR-1 Registration No. - CSR00056854
Registration Section 12A - AAZCS8416JE20211
Registration Section 80G - AAZCSS416JF20214
(Dated 28-05-2021 and Valid Up to AY 2021-25)

Shri. Chandrakant Dalvi
IAS Retd.
Chairman, SATV Foundation
Contact Shri. Sunil Chavan (Author)
(M. 9881098180) for additional Information
